उतू गेलेले दूध : व्हर्गीस कुरीअन
आज सकाळी दूध तापायला ठेवले आणि पेपर वाचायला घेतला.
तिकडे दूध उतू गेले कळलेच नाही . कप भर दूध वाया गेले म्हणून वाईट वाटले .
पुन्हा आई ची बडबड झाली . मी सकाळचा चहा घेतला नाही. प्रायश्चित्त म्हणून .
संध्याकाळी चहा घेतला आणि बातमी ऐकली . व्हर्गीस कुरीअन गेले .एम पी एस
सी च्या परीक्षेलां बसायचो तेव्हा हमखास एक प्रश्न यायचा ..’धवल क्रांती
चे जनक कोण ?’ मला उत्तर माहीत असायचे ..कारण व्यक्तीचे नाव वेगळेच वाटायचे
‘ व्हर्गीस कुरीअन ‘ ..
व्हर्गीस कुरीअन सिरीअन ख्रिश्चन होते. “दूध” हा विषय तसा
गवळ्यांच्या किंवा यादव वन्शियांचा. पण व्हर्गीस कुरीअन या सिरीअन
ख्रिश्चन व्यक्तीने भारतात दुधाची “धवल क्रांती ” घडवली . गुजरात येथील
आणंद येथे १९४६ साली सहकार तत्वावर स्थापन झालेल्या ‘अमूल ‘ या दुग्ध
प्रकल्पाने त्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास घडवला.छोटे छोटे ग्रामीण दूध
विक्रेते भागधारक असलेल्या ‘अमूल’ ने अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुसंडी
मारली.दुधाच्या जागतिक बाजारात ‘अमूल’ चा वाटा १७ % झाला .जागतिकीकरणाच्या
हि आधीचा तो काळ होता. व्हर्गीस कुरियन यांच्या धवल क्रांती ने प्रेरित
होवून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘मंथन ‘ हा सिनेमा
बनवला. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती हि सहकार तत्वावरच झाली होती.
अमूल चे छोटे छोटे भागधारक शेतकरी या चित्रपटाचे निर्माते होते .स्मिता
पाटील व नसिरुद्दीन शहा चा हा चित्रपट न्यूयॉर्क मध्ये २५ आठवडे चालला.
जगात दुधाची पावडर गाईच्या दुधापासून बनवली जाते. व्हर्गीस
कुरीअन आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हशीच्या दुधापासून दुधाची पावडर
बनविण्याचे तंत्र शोधले आणि ‘नेसले’ या बलाढ्य ब्रांड ला जागतिक बाजारपेठेत
टक्कर दिली . भारत सरकारने १९६५ साली “भारतीय दुग्ध विकास महामंडळाची”
स्थापना केली तीच मुळात कुरियन यांच्या आणंद येथील अमूल प्रकल्पाच्या
धर्तीवर . व्हर्गीस कुरीअन यांना जगात ‘मिल्क म्यान’ म्हणून ओळखतात .
भारतातील धवल क्रांतीचा हा जनक आज वयाच्या ९० व्या वर्षी काळाच्या पडद्या
आड गेला. व्हर्गीस कुरीअन यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वर चरणी
प्रार्थना …
-अवि







